मुक्ति हे ध्येय एक । मार्ग असती अनेक । निवड करावी त्याची । परिस्थिती पाहून स्वत:ची ॥
असेल देणगी बुद्धीची । धरावी कास ज्ञानमार्गाची । राहावे ईश्वरसंन्निधानी । दृढभाव एकतत्त्वी धरोनी ॥
बहुसंख्य मुमुक्षु सामान्य । जगती जीवन सर्वसामान्य । नित्य कर्तव्यकर्म करिती । फळ मात्र त्यागिती ॥
प्रपंच सर्वस्वी सोडुनी । एकांती जावे वनी । परि वासना मनी रहाती । मग कशी मिळावी मुक्ति ॥
असावे प्रियजनांमध्ये जरी । नसाव्या वासना परि । जे येई सामोरे जीवनी । ते आनंदे स्वीकारूनी ॥
जरी कांही इच्छा व्हावी । तपासून ती पहावी । तीव्रता तिची जोखावी । अविचारी कृति न करावी ॥
मग बव्हंशी इच्छा विरती । जरी क्वचित उरती । माफक करावी त्यांची पूर्ति । नियंत्रित मन हीच मुक्ति ॥
आपण त्रिगुणांच्या हातचे । बाहुली कळसूत्रीचे । शरणागति परमेश्वर चरणासी । हाचि उपाय यासी ॥
द्वैतभाव सर्वस्वी त्यागुनी । मी माझे सोडुनी । परमेश्वरच कर्ता कारण । कर्मफळ त्यालाच अर्पण ॥
भित्तीचित्र विशाल एक । असावे उभे अगदी नजीक । दिसावा एकच भाग त्याचा । न कळे अर्थ त्याचा ॥
चित्रापासून दूर जावे । पूर्ण चित्र दृष्टीस यावे । प्रपंचापासून अंतर राखिती । त्यांची होईल जिवंत मुक्ति ॥
जावे शरण सद्गुरुचरणी । कायावाचामने करूनी । मग सद्गुरु देई अंतर्दृष्टि । जशी विश्वरूपदर्शनासाठी ॥
कामक्रोधलोभ हे वैरी । मिळवा विजय त्यांवरी । तीच मुक्ति जिवंत असता । नुरे मृत्यूवेळेची चिंता ॥
ईश्वर निराकार निर्गुणी । त्यासी धरावे सदैव ध्यानी । परि ते कठीण अति । करावी सगुण पूजाभक्ति ॥
साहित्य वा पूजापद्धति । नसावी त्यांची किंचित महती । मन करावे एकाग्र । एकचि ईश्वर समग्र ।
नसावी चिंता ऐहिकाची । धरावी कास अद्वैताची । ती भक्ति अव्यभिचारी । न कोणी दाता वा भिकारी ।
हे घडेल अभ्यासाने । हळूहळू कांही कालाने । चिकाटी ठेवावी प्रयत्नांची । पराकाष्ठा करावी धैर्याची ।
वाटे अवघड अशी भक्ति । तरी करावे कर्म निगुती । सोडुनी फळाची चिंता । धर्म अधर्माची नसावी आस्था ॥
नसावी भ्रांति पूर्वकर्माची । आज जर कळकळ आत्मानुभूतीची । पश्चात्तापदग्ध तपश्चर्या केली । वाल्मिकी झाला वाल्याकोळी ॥
-
Recent Posts
Recent Comments
Manas on (38) Vairagya Mr. Vasekar on (३४) आध्यात्मिक साधना whatalexandresays on (14) God Consciousness Jack on श्रीमद्भगवद्गीतेचे काव्यरूप सा… rishi vasanth on (13) Free Will Archives
Categories
Meta