(२९) मुक्ति कशी मिळेल?

मुक्ति हे ध्येय एक । मार्ग असती अनेक । निवड करावी त्याची । परिस्थिती पाहून स्वत:ची ॥
असेल देणगी बुद्धीची । धरावी कास ज्ञानमार्गाची । राहावे ईश्वरसंन्निधानी । दृढभाव एकतत्त्वी धरोनी ॥
बहुसंख्य मुमुक्षु सामान्य । जगती जीवन सर्वसामान्य । नित्य कर्तव्यकर्म करिती । फळ मात्र त्यागिती ॥
प्रपंच सर्वस्वी सोडुनी । एकांती जावे वनी । परि वासना मनी रहाती । मग कशी मिळावी मुक्ति ॥
असावे प्रियजनांमध्ये जरी । नसाव्या वासना परि । जे येई सामोरे जीवनी । ते आनंदे स्वीकारूनी ॥
जरी कांही इच्छा व्हावी ।  तपासून ती पहावी । तीव्रता तिची जोखावी । अविचारी कृति न करावी ॥
मग बव्हंशी इच्छा विरती । जरी क्वचित उरती । माफक करावी त्यांची पूर्ति । नियंत्रित मन हीच मुक्ति ॥
आपण त्रिगुणांच्या हातचे । बाहुली कळसूत्रीचे । शरणागति परमेश्वर चरणासी । हाचि उपाय यासी ॥
द्वैतभाव सर्वस्वी त्यागुनी । मी माझे सोडुनी । परमेश्वरच कर्ता कारण । कर्मफळ त्यालाच अर्पण ॥
भित्तीचित्र विशाल एक । असावे उभे अगदी नजीक । दिसावा एकच भाग त्याचा । न कळे अर्थ त्याचा ॥
चित्रापासून दूर जावे । पूर्ण चित्र दृष्टीस यावे । प्रपंचापासून अंतर राखिती । त्यांची होईल जिवंत मुक्ति ॥
जावे शरण सद्गुरुचरणी । कायावाचामने करूनी । मग सद्गुरु देई अंतर्दृष्टि । जशी विश्वरूपदर्शनासाठी ॥
कामक्रोधलोभ हे वैरी । मिळवा विजय त्यांवरी । तीच मुक्ति जिवंत असता । नुरे मृत्यूवेळेची चिंता ॥
ईश्वर निराकार निर्गुणी । त्यासी धरावे सदैव ध्यानी । परि ते कठीण अति । करावी सगुण पूजाभक्ति ॥
साहित्य वा पूजापद्धति । नसावी त्यांची किंचित महती । मन करावे एकाग्र । एकचि ईश्वर समग्र ।
नसावी चिंता ऐहिकाची । धरावी कास अद्वैताची । ती भक्ति अव्यभिचारी । न कोणी दाता वा भिकारी ।
हे घडेल अभ्यासाने । हळूहळू कांही कालाने । चिकाटी ठेवावी प्रयत्नांची । पराकाष्ठा करावी धैर्याची ।
वाटे अवघड अशी भक्ति । तरी करावे कर्म निगुती । सोडुनी फळाची चिंता । धर्म अधर्माची नसावी आस्था ॥
नसावी भ्रांति पूर्वकर्माची । आज जर कळकळ आत्मानुभूतीची । पश्चात्तापदग्ध तपश्चर्या केली । वाल्मिकी झाला वाल्याकोळी ॥

About kishorkulkarni

I am happily retired and enjoy writing and communicating with friends.
This entry was posted in अध्यात्म and tagged , , , , , , , . Bookmark the permalink.

Leave a comment